जय सेवालाल गोर विकास चव्हाण मो.8888659582

Facebook

Thursday, 4 January 2018

बंजारा तांडा प्रशासन विषयी जाणून घ्या..।।Banjara News।।

तांडा प्रशासन

भारतातील प्राचीन वंशापैकी गोरवंश एक आहे. या गोरवंशाच्या लोकांनाच आज भारतात बहुतांशी प्रमाणात बंजारा या नावाने ओळखले जाते. बंजारा हे आदिवासी आहेत. ते आदिवाशी आहेत म्हणजेच भारताने ते मुळनिवासी आहेत. त्यामुळे सिंधु संस्कृतीकाळापासुन या जमातीचे अस्तिव आढळुन येते. पण भारतात इतिहासलेखनाची परंपरा जगाच्या मानाने उशिरा सुरु झाल्यामुळे अनेक जमातीचा इतिहास दुर्लक्षित राहिला. तो लिहिला गेला नाही. म्हणुन एका स्वंतत्र उज्वल संस्कृतीखाली वावरणाऱ्या वंचित बंजारा जमातीच्या तांडा प्रशासनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न मी प्रस्तुत शोधनिबंधात करत आहे.
तांडा म्हणजे बंजारा लोकांचा समुदाय होय.व्यवसायाचा निमित्ताने भटकणाऱ्या बंजारा समुदायाला तांडा असे म्हणतात. अलीकडील काळात या समाजाचे भटकने बंद झाले तेव्हा बंजारे जेथे वास्तव्य करतात त्या ठिकाणाला आता तांडा असे म्हटले जाते. या तांडयाचे वैशिष्टे म्हणजे यात फक्त बंजारा समाजातील लोक वास्तव्यास असतात. इतर समाजातील लोकांना तांडयात स्थान नसते. तसेच हे तांडे गावापासुन दुर डोंगरदऱ्यात आढळुन येतात. सर्व्हेअंती असे सिध्द होते की, पाण्याची मुबलक सोय, गुराढोरांना चरण्यासाठी मोकळे मैदान पाहुनच तांडे वसलेले दिसुन येतात. या तांडयाची व्यवस्था सुरळीत चालावी यासाठी तांडयाची एक स्वतंत्र प्रशासन व्यवस्था असते त्या तांडा प्रशासन व्यवस्थेत पुढील घटकांचा समावेश होता.
बंजारा समाज मागासलेल्या अवस्थेत असताना त्यांच्या टोळयांना निसर्ग व हिंस्त्र पशूंसोबत सतत सामना करावा लागत असे. आलेल्या संकटांना तोंड देणे हे सामुदायिक प्रयत्नांशिवाय शक्य नव्हते. याच धारणेतून बंजारात लोकगणात समूह भावना जोपासली गेली. पावसाळयात बंजारा समाज आपआपल्या झोपडया बांधून राहात होता. त्याला “झुपडी” असे म्हणतात. ही “झुपडी” पावसाळयापुरतीच मर्यादित राहत होती. पुढे बहुर्विवाही गोत्रांचा गटसमूह “तांडा” या नावाने ओळखला जाऊ लागला व तांडयाची देखरेख करण्यासाठी “गोरपंचायत” प्रशासनाची पध्दत तांडयात रुढ झाली. ही गोरपंचायत तीनस्तरीय असून तिचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येते.
१) नसाबीः- न्यायदान करणारी समिती
२) हासाबीः- आर्थिक उपाययोजना करणारी समिती
३) मळावः- दोन किंवा त्यांपेक्षा अधिक तांडयांतील पेचप्रसंग सोडविण्यासाठी बोलावलेली सभा (मेळावा)
या तीनस्तरीय पंचायतीचा प्रमुख नायक असतो. एकंदरीत तांडयाचे नेतृत्व नायकाकडे असते. तो गोरपंचायतीचा प्रधान असतो. त्यालाच “नायक” म्हणतात. जातपंचायतीतील महत्वाच्या व्यक्ती खालील प्रमाणे
नाराक
नाराक हा तेलगु शब्द आहे. या शब्दाचा अर्थ मालक किंवा प्रमुख असा होतो. म्हणजेच तांडयाचा जो प्रमुख असतो त्याला नायक अथवा नाईक असे म्हटले जात असे. बंजारा जमातीत नायकाचे पद प्रशासनात सर्वोच्च असे होते. तांडयातील सर्व तंटे मिटवण्याचा अधिकार हा नायकाला होता. तो आजच्या सर्वोच्च न्यायालयाप्रमाणे भुमिका बजावत असे. जातपंचायतीत अंतिम निर्णय नायकाचाच असे. तांडयात प्रत्येक गोष्ट नायकाला विचारल्याशिवाय केली जात नसे.तंटे मिटवने नवयुवकांचे विवाह, तांडयातील मुलभुत सुविधा , समस्या अदि अनेक महत्वपुर्ण कामे नायकाला पार पाडावी लागत असे. थोडक्यात नायक हा एकप्रकारे राजासारखीच भुमिका तांडा प्रशासनात पार पाडत असे.

“नायक” हा जातपंचायत व तांडा यांमधील महत्वाचा दुवा असतो. नायकाची निवड वंशपरंपरेने होत असून “ओरी” नावाच्या बोकूडबळीच्या प्रथेने “नायक” पदाचे शिक्कामोर्तब केले जाते. बळी दिलेल्या बेकडाच्या मांसाचे समान हिस्से तांडयातील कुटुंबात वाटायचे असतात. त्याचबरोबर नायकाच्या हिश्श्यासोबत बोकडाच्या पायाचे विशिष्ट हाड असते. याला बंजारा बोलीत “घुंडीवाळो हाडका” असे म्हणतात. हे हाड बकऱ्याच्या अवयवांना एकमेकास जोडणाऱ्या सांध्याचे हाड असते. नायक हा गोरपंचायत व तांडा यामधील दुवा असल्यामुळे तांडयाच्या नायकास “घुंडीवाळो हाडका” देण्याची प्रथा रुढ झाली.
नायकाचे पद वंशपरंपरेने चालते. नायक निपुत्रिक मरण पावला तर त्याच्या गोत्रातील सर्वांत जवळच्या नातेवाइकाला “नायक”म्हणून नेमण्यात येते. नायक हा नसाब, हासाब, मळाव इत्यादी समाजातील प्रमुख लोकसभेचे आयोजन करतो. या वेळी सामाजिक, आर्थिक, धार्मिक, गुन्हेगारी स्वरुपाच्या ज्या समस्या असतात, त्या वरील बैठकींच्या माध्यमातून सोडविल्या जातात. हा गोरपंचायतीचा प्रमुख असतो. संपूर्ण कारभार नायकाच्या नावाने चालतो. पंचायतीचा निर्णय तांडयास बंधनकारक असतो. नायकाच्या नावाने चालतो. पंचायतीचा निर्णय तांडयास बंधनकारक असतो. नायकाच्या संमतीशिवाय कोणतेही सण, उत्सव तांडयात साजरे केले जात नाहीत. तसेच विवाह जुळविणे, घटस्फोट देणे, घेणे व वधुमूल्य ठरविताना नायकाची उपस्थिती असावीच लागते. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांचे सांत्वन सामूहिक पध्दतीने करतात, तेव्हा नायक उपस्थित असतो. दैनंदिन व्यक्तिगत व सामूहिक चळवळीला नायकाची मान्यता बंजारागणाने अनिवार्य मानलेली आहे.

कारभारी
तांडा प्रशासनातील नायकानंतरची महत्वपुर्ण व्यक्ती म्हणजे कारभारी होय. प्रत्यक्ष कारभार पाहणारा तो कारभारी तांडयातील सर्व कामकाजाचे भार कारभाऱ्यावर होते. एकप्रकारे वास्तविक प्रमुखाप्रमाणे (पंतप्रधानाप्रमाणे) कारभाऱ्याला कामकाज पहावा लागत असे. नायकाच्या आदेशाचे पालन तांडयात होत आहे का नाही तांडयातील समस्या, पायाभुत सुविधांची कामे आदि सर्व कामकाजावर कारभाऱ्याचे नियंत्रण असे. सामान्य जनता आणि नायक यामधील महत्वपुर्ण दुवा म्हणुन कारभाऱ्याचे कार्य तांडा प्रशासनात महत्वपुर्ण असे होते.
नायकाला तांडाकार्यात वेळोवेळी सल्ला देणाऱ्या, निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणाऱ्या व मदत करणाऱ्या प्रमुख व्यक्तीस “कारभारी” असे म्हणतात.नायकाच्या गैरहजेरीत गोरपंचायतीचे कार्य कारभारी पाहतो. एक प्रभावी व्यक्ती म्हणून कारभारी या पदाकडे पाहिले जाते. या कारभाऱ्याची निवड ही वंशपरंपरेने होते.
डायें- साणे
डाये म्हणजे बुजुर्ग व्यक्ती तर साणे म्हणजे समजुतदार व्यक्ती होय. समाजातील अनुभवी समजुतदार अशा बुजुर्ग व्यक्तीचा सल्ला तांडयाला मिळावा यासाठी डायें-साणे हे पद बंजारा प्रशासनात निर्माण करण्यात आलेले होते. तांडयातील गहन समस्यावर सल्लामसलत न्यायनिवाडयात कारभारी आणि नायकास मदत ताडयांतील नव्या सुविधा सुचविणे आदि महत्वपुर्ण कामे डाये-साणे पदावरील व्यक्तीना पार पाडावे लागत असे.
पंचायतीमध्ये वादी-प्रतिवादींचे गाऱ्हाणे ऐकल्यानंतर “अंतिम निकाल” देणाऱ्या व्यक्तीस “डावो साणो” म्हणतात. हे “दून्धकचेरी” नावाच्या न्यायसंस्थेचे सभासद असतात. एखाद्या वादावर किंवा सामाजिक स्वरुपाचा पेचप्रसंग सोडवायचा असेल तर त्याकरिता आयोजित केलेल्या बैठकीस ” दूधकचेरी” असे म्हणतात. या दूधकचेरीचा निकाल अंतिम असतो. दूधकचेरीच्या निकालानंतर आरोपीस अपील करण्याची सोय नसते. तांडयातील जनतेने किंवा आसामीने नायकाचा निर्णय मानणे बंधनकारक असते. पंचमंडळाने घेतलेला निर्णय हा नायकाचा निर्णय मानला जातो.
हसाबी- नसाबी
तांडयाचा सर्व आर्थिक हिशोब ठेवणाऱ्या व्यक्तीला हसाबी असे म्हटले जाई तर सल्लामसलत करणाऱ्या व्यक्तीस नसाबी असे म्हटले जात असे.तांडयाचा जमाखर्च विविध योजनांना येणारा अंदाजीत खर्च, तिजोरीतील शिल्लक आदि माहिती हसाबी ठेवत असे.तर नसाबी हा व्यक्ती तांडयासाठी नवनविन योजना, समस्या आदिंवर विचार करुन नायक आणि कारभाऱ्यास सुचना करत असे.
ढालीया
बंजारा ही जमात वास्तवता गावगाडयाची बाहेरची आहे. पण गावगाडयात जसे कोतवालास निरोप्याचे किंवा वर्दी देण्याचे काम करावे लागत असे तसेच ढालीया पदावरील व्यक्तीस तांडा प्रशासनात निरोप्याचे काम करावे लागत असे. या तांडयातुन त्या ताडयात निरोप देणे, जातपंचायत आणि विवाहप्रसंगी नगारा वाजवुन दवंडी देणे आदि कामे ढालिया पदावरील व्यक्तीस पार पाडावी लागत असत.
सनार
सोनाराला बंजारा (गोरमाटी) भाषेत सनार असे म्हटले जाई. विविध आभुषणे बनवण्याचे काम सोनाराचे असे. बंजारा स्त्री ही अंलकारप्रिय होती. सिंधु संस्कृतीकालीन अलंकार आणि बंजारा जमातीतील स्त्रीयांचे अलंकार यात मोठे साम्यही आढळुन येते. बंजारा जमातीतील स्त्री आणि पुरुष यांच्या आभुषनाची पुर्तता करण्याचे कार्य सणार या पदावरील व्यक्तीचे असे.
धाडी
धाडी पदावरील व्यक्ती विविध कलांमध्ये पारंगत असे. नायक आणि कारभाऱ्यांवर स्तुतीपर काव्य रचने, वंशावळीची जपणुक करणे, विवाह जुळवणे, गितगायन करणे, विरपुरुषांवर काव्य रचने आदि कलायुक्त कार्ये ढाडी पदावरील व्यक्तीस करावी लागत असे. बंजारा जमातीची माहिती मौखिक स्वरुपात पुढील पिढयांना पुरवण्याचे कार्य या पदावरील व्यक्ती करत असे.
अशा प्रकारे तांडा प्रशासनात विविध पदावरील व्यक्तीव्दारे प्रशासन राबविले जात असत.
प्रा.बी.एन.राठोड
शारदानगर ,लातुर

BANJARA SUPERHIT SONG
।।मारो नायक तांडरो।।



Share:

Related Posts:

0 comments:

Post a Comment

Definition List

[blogger][disqus][facebook]

Unordered List

designcart

Support

blogger/disqus/facebook